
माय सावित्री किती सोसलेस तू …..!
साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज नेटवर्क
आज ०३ जानेवारी राष्ट्रमाता क्रांतीज्योती ज्ञानज्योती माय सावित्रीबाई फुले यांची जयंती निमित्त राष्ट्रमातेच्या चरणी विनम्र अभिवादन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जल्म दिवस आपण “बालिका दिन व महिला मुक्ती दिन म्हणुन साजरा करत असतो …!
उद्धारण्या भारत मातेच्या लेकी ….!
दिली तू सुखाला आहुती ॥
सावित्री तुझ्यामुळे तेवत आहे !
आज जगती ज्ञानज्योती ॥
भारतात स्त्री शिक्षणाची पाळेमुळे! रोवनाऱ्या पहिल्या शिक्षिका व मुख्याध्यापिका क्रांतीज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई जोतीराव फुले यांचा जल्म ०३, जानेवारी १८३१रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे आई लक्ष्मीबाई व वडील खंडोंजी नेवसे पाटील यांच्या घरात झाला वडील गावाचे पाटील असल्या मुळे घरी नेहमीच वर्दळ असे.स्त्री स्वातंत्र्य म्हणजे काय स्त्रीने उंबरठाबाहेर पाऊल न टाकता फक्त चुल आणी मूल हेच बघायचे अशा विचारांच्या समाजात इ .स.१८४० मध्ये वय अवघे ०९ वर्षाचे असतांना .१३ वर्ष वयाच्या महात्मा जोतीराव फुले यांच्याशी त्यांचा विवाह झाला .मुलींनी घराबाहेर का पडू नये त्यांनी साक्षर का होऊ नये .महिलावर एवढी बंधन का .जोखड का ?स्त्री शिकली पाहिजे हा विचार त्यांना स्वस्त बसू देत नव्हता म्हणूनच त्यांनी स्त्री शिक्षणाचे कार्य हाती घेतले
स्त्रियांच्या शिक्षणाची खरी!
सावित्री तूच कैवारी ॥
तुझ्यामुळेच शिकते आहे !
आज प्रत्येक नारी ॥
…जोतिबा लहानपणापासुनच जातीयतेचे चटके सोसत होते त्या काळी महिला विषयी अनेक वाईट अमानुष कुप्रथा कर्मकांड समाजात रूढ़ होत्या जसे केशवपण .बालविवाह .सतीची चाल. विधवा पद्धत.विटाळ्. इत्यादि प्रथा सावित्रीबाईनी आपल्या डोळ्या देखत बघितल्या नंतर त्यांचे मन गहिवरून आले महिलावर होणाऱ्या या अन्याया विरुध्द आवाज उठवण्यासाठी जोतिबाच्या खांद्याला खांदा लावून सावित्रीबाई उभ्या ठाकल्या स्त्रिया वरील हा अन्याय दूर करायचा असेल तर आधी ती शिकली पाहिजे. साक्षर झाली पाहिजे. स्त्री साक्षर झाली म्हणजे तिचा आत्मविश्वास वाढेल हे सावित्री बाईनी जाणले आणी येथूनच त्यांनी स्त्री शिक्षणाच्या कार्याला समाजाचा त्रास अमानुष छळ अपमान सहन करत मुहूर्तमेढ रोवून सुरवात
महिलांना जीने दिली !,
ज्ञानाची सावली ॥
धन्य ती क्रांती ज्योती !
सावित्री माऊली ॥
०१ जानेवारी १८४८ रोजी
पुण्यात बुधवार पेठेतील भिडेवाड्यात जोतीरावांनी मुलींची शाळा चालू केली या शाळेत शिक्षिका म्हणुन सावित्री बाईंची नेमणूक करण्यात आली त्यामुळेच सावित्री बाईंना पहिल्या भारतीय शिक्षिका म्हटले जाते या शाळेत जातांना त्यांना समाजा कडून अमानुष छळ सहन करावा लागला पण त्या डगमगल्या नाहीत सावित्री बाई मुलींना शिकवते म्हणजे वाईट काम करते समाजा विरुध्द काम करते असे त्या काळात दुराग्राही समाजाचे विचार होते .सावित्रीबाई शाळेत जायला लागल्या की लोक त्यांच्या अंगावर चिखल दगड खरकटें पाणी अंडे फेकून मारत असत सावित्री बाई मुकाट्याने हा अन्याय सहन करत शाळेत जात असत कारन ते जानत होते चांगले कार्य करतांना त्रास हा, होतोच स्त्री शिक्षणाचे महत्व आज जरी समाजाला कळत नसेल तरी एक दिवस नक्कीच त्यांना स्त्री शिक्षणाचे महत्व कळेल म्हणुन म्हणावेसे वाटते …
सावित्री तू सोसलेस !
दगड आणी धोंडे ॥
रोवलेस झेंडे शिक्षणाचे !
सावित्री बाईच्या या शैक्षणीक कार्यात फातेमा शेख व सगुणाबाई क्षीरसागर यांनी मोलाचे सहकार्य केले फातेमा शेख हया पहिल्या मुस्लिम शिक्षिका ठरल्या त्यांना ही समाजाने खूप त्रास दिला परंतु फातेमा शेख यांनी शेवट पर्यंत सावित्री बाईची साथ सोडली नाही .सावित्री बाईंनी शिक्षणाचे कार्य करत असतांना २८ जानेवारी १८६३ साली बालहत्या प्रतिबंधक ग्रुहाची स्थापना केली व प्रसूतीग्रूह ही सुरू केले तसेच सासवड येथे झालेल्या सत्यशोधक परिषदेचे अध्यक्ष पद सावित्रीबाईंनी भूषवले पोटासाठी शरीर विक्रय करणाऱ्या महिलांना दृष्ट लोकांच्या तावडीतून सोडवून त्यांना आधार देऊन स्वावलंबी बनवले या कामात त्यांना पंडिता रमाबाई यांनी मोलाची मदत केली
स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनाला !
सावित्री उजळवलेस तू ॥
क्रांतीज्योती ज्ञानज्योती !
दीनाची खरी माय तू ॥
सावित्री बाईंना मुलगा नव्हता म्हणुन विधवा ब्राम्हण महिलेचा मुलगा “यशवंत” याला दत्तक घेऊन त्याचे शिक्षण करून त्याला डॉक्टर बनवले जुलै १८८७ मध्ये ज्योतीबा फुले यांना पक्षघाताचा आजार झाला २८ नोव्हेंबर १८९० रोजी जोतीरांवांचे निधन झाले यशवंत हा विधवा स्त्री चा मुलगा असल्यामुळे त्याला कुणीही लग्नासाठी मुलगी द्यायला तयार नव्हते तेव्हा मोठ्या धाड्साने सावित्रीबाईंनी ज्ञानोबा कृष्णाजी ससाणे यांच्या “राधा”नावाच्या मुलीशी ०४ फेब्रुवारी १८८९ रोजी सावित्रीबाईंनी यशवंत चा विवाह लावून दिला .हाच महाराष्ट्रातील पहिला अंतरजातीय विवाह होय .सावित्रीबाई फुले यांनी त्या काळात साहित्य क्षेत्रात भरीव कामगिरी केली .काव्यफुले / सावित्रीबाईची गाणी /सुबोध रत्नाकर /बावनकशी /इत्यादि पुस्तके लिहिली म्हणूनच सावित्री बाई ज्ञानज्योती क्रांतीज्योती ठरल्या
सोसुनी अनंत यातना !
शिकवलेस तू स्त्रियांना ॥
धन्य धन्य होतो आम्ही !
थोरवी तुझी गातांना ॥
इ .स १८९७ मध्ये पुण्यात प्लेगच्या साथीने थैमान घातले हा प्लेगचा आजार भयानक होता व संसर्गजन्य होता हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेत होता प्लेग पीड़ितांची सेवा करताना मुंढव्याच्या दलित वस्तीत राहाणाऱ्या पांडुरंग बाबाजी गायकवाड या मुलाला प्लेगची लागण झाली पांडुरंग ला मुंढव्या पासून आठ किलोमीटर चालत त्यांनी ससानेनगर येथील माळावरच्या दवाखान्यात घेऊन जाऊन ऍडमिट करून पांडुरंग वर उपचार केलेत पांडुरंग वाचला परंतु सावित्री बाईंना प्लेगची लागण झाली यातच १० मार्च १८९७ रोजी वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली सावित्रीबाईच्या या सामाजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणुन १९९५ पासून ०३, जानेवारी हा दिवस सावित्री बाईचा जल्मदिन “बालिका दिन”व महिला मुक्ती दिन म्हणुन साजरा केला जातो.
माय सावित्री आज सांगतो मी नारीची व्यथा !
अन्याय करणारी आजची बांडगूळाची कथा ॥
माणसांत माणसं आम्ही न राहिलो !
नारिचा सन्मान आम्ही विसरलो ॥
इ .स .१९९५ पासून आम्ही राष्ट्रमाता क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा जल्मदिवस आम्ही “बालिका दिन”म्हणुन साजरा करत आहोत परंतु परंतु आजची बालिका महिला सुरक्षीत आहे का ?आपल्या आजुबाजुला नजर फेकली की लक्षात येते की सावित्री बाईंना जाऊन कित्येक, वर्ष लोटली त्यांनी दिलेले ज्ञान शिकवण आम्ही किती किती आत्मसात करतो हा चिँतनाचा, विषय आहे महिला वर होणारे अन्याय वाढतच आहेत वर्तमानपत्र हातात पडले किंवा दूरदर्शन चालू केले की सर्वात जास्त बातम्या हया महिलावर होणाऱ्या अन्यायाच्या असतात त्यांचा होणारा छळ अत्याचार पीळवनुक अजून ही कमी झाली अशी वाटत याला जबाबदार आजची पुरुष संस्कॄती आहे आज महिला जरी प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असली तरी तिला कुठे ना कुठे मानसिक किंवा शारीरिक पीळवनुकीची ती बळी ठरत असते हे थांबायला हवे आज बालिका दिन या भूतलावरील प्रत्येक महिला बालिका पूर्णपणे सुरक्षित होतील आणि महीलावर अन्याय करणाऱ्या नराधमांना त्वरित शिक्षा मिळत जाईल आणी प्रत्येक व्यक्तीच्या मनामनात राष्ट्रमाता क्रांतीज्योती सावित्री बाई फुले यांचे आचार विचार आचरणात येतील तोच खरा बालिका दिन
या भूतलावरील समस्त बालिका व महिलांना बालिका दिन व महिला मुक्ती दिना च्या हार्दिक शुभेच्छा देऊन राष्ट्रमाता क्रांतीज्योती ज्ञानज्योती माय सावित्रीबाई फूलेच्या चरणी विनम्र अभिवादन करतो व शेवटी एवढेच म्हणेन
माय सावित्री तू पुन्हा जल्म घे !
प्रत्येक नारिला तुझ्या पंखाचे बळ दे ॥
घेत आहे ती आकाश भरारी !
जल्मास आली असली जरी नारी ॥
नार या जगताची तपस्वीनी !
चुकून ही अबला तिला म्हणू नये कुणी ॥
“श्रीधर “वंदन करितो माय सावित्री चरणी !
“श्रीधर “वंदन करितो माय सावित्री चरणी ॥
– श्रीधर बच्छाव (पाटील )
कवी /लेखक /समीक्षक
बालाजी नगर सिल्लोड
जि .छ् .संभाजीनगर
