
महायुतीचं ठरलं? मुख्यमंत्री अन् दोन उपमुख्यमंत्रिपदाचा पॅटर्न कायम राहणार?
साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज नेटवर्क
विधानसभा निवडणुकीत महायुतीचा अभूतपूर्व विजय झाला आहे. भाजपला आतापर्यंतचं मोठं यश मिळालं आहे. तर महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे.
यावेळी महाविकास आघाडीला 50 चा आकडा गाठणंही मुश्कील झाल्याचं पाहायला मिळालं. तर महायुतीनं 236 जागा जिंकल्या आहेत.
मात्र आता विधानसभेच्या या निकालानंतर आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशातच आता उद्या शपथविधी सोहळा होणार आहे.
मुंबईतील वानखेडे मैदानावर हा शपथविधी सोहळा होणार असल्याची माहिती मिळाली आहे. कारण 26 तारखेला विधानसभेचा कार्यकाळ संपत असल्यानं एक दिवस आधीच सरकार स्थापन केलं जाणार असल्याचं समजत आहे.
परंतु, राज्यात महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा हा भाजपचाच असणार अशी माहिती मिळाली आहे. मात्र यासंदर्भात अधिकृत घोषणा झाली नाही.
याशिवाय महाराष्ट्रात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्रिपदाचा पॅटर्न कायम राहणार असल्याचं बोललं जात आहे. तसेच महायुती सरकारच्या तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांकडे ही प्रमुख पदं कायम राहणार आहेत.
