
हरित ऊर्जेच्या माध्यमातून हरित क्रांती…
विजबिल माफीसोबतच दिवसा विजेचे स्वप्न पूर्ण होणार!
साक्षर इंडिया लाईव्ह न्युज नेटवर्क
मुंबई, २४ डिसेंबर : मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत वाशिम जिल्ह्यातील उंबर्डा येथील ४ मेगावॅट क्षमतेच्या आणि धाराशिव जिल्ह्यातील नारंगवाडी येथील २ मेगावॅट क्षमतेच्या अशा एकूण ६ मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे झाले.
यावेळी संबंधित विभागाचे सचिव आणि इतर अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी दूरदृश्य प्रणालीद्वारे उंबर्डा आणि नारंगवाडी येथील शेतकर्यांसोबत मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी संवाद साधला.
या माध्यमातून सौर ग्राम तयार करण्याचे आणि शेतकर्यांना दिवसा वीज देण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम करत असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केले. यामुळे शेतकर्यांना दिवसा शाश्वत वीज उपलब्ध होणार आहे.
शेतकर्यांना एकूण १६०० मेगा वॅट इतकी वीज लागते. हे सर्व फिडर सौर उर्जेवर आणण्यासाठी राज्य शासनाने २ वर्षांपूर्वी कार्यक्रम हाती घेतला होता. यामार्फत टप्प्या-टप्प्याने एक-एक गाव सौर ऊर्जित होते आहे. शेतकर्यांना याआधी दिली जाणारी वीज सरकारला ₹७ प्रती युनिट पडत असून शेतकर्यांकडून यासाठी ₹१.५ आकारले जात असत. त्यामुळे सबसिडीचा बोजा सरकारवर पडत होता. या योजनेमुळे या वीजेसाठी आता केवळ ₹३ लागणार असल्याने मोफत विजेच्या योजनेचा सरकारवर बोजा पडणार नाही. यासोबतच या योजनेला पुढे देखील सातत्याने चालवता येणार आहे.
यावेळी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० च्या मदतीने हरित उर्जेमार्फत शेतकरी आपल्या गावांमध्ये हरित क्रांती आणतील हा विश्वास मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.
