
शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यात किती शिक्षकांची होणार भरती?
साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज नेटवर्क वृत्तसंस्था
शिक्षक भरतीसाठी संचमान्यता, तसेच पटपडताळणी करण्यात येणार आहे. त्यातून नेमक्या किती जागा रिक्त आहेत, त्याची निश्चिती करण्यात येईल.
पुणे : पवित्र संकेतस्थळामार्फत शिक्षक भरती प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्यात दहा हजार शिक्षकांची भरती करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना आता संधी मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिक्षण विभागाची आढावा बैठक राज्य मंडळात झाली. त्यानंतर भुसे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिक्षक भरतीसाठी संचमान्यता, तसेच पटपडताळणी करण्यात येणार आहे. त्यातून नेमक्या किती जागा रिक्त आहेत, त्याची निश्चिती करण्यात येईल. त्यानंतर यापूर्वीच्या भरतीमधील नियुक्ती प्रलंबित असलेल्यांना संधी देण्यात येणार आहे. त्यानंतर रिक्त जागांवर नवीन शिक्षक भरती करण्यात येणार आहे, असे भुसे यांनी सांगितले. शिक्षक भरतीसंदर्भात शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनीही सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२२ नुसार पवित्र संकेतस्थळाद्वारे पहिल्या टप्प्यातील पदभरतीची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे
