बजाजनगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात एकदिवसीय हिवाळी मुल्यसंस्कार शिबीर उत्साहात संपन्न
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व बालसंस्कार प्रतिनिधी, युवा प्रतिनिधी यांनी सहकार्य केले.

बजाजनगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात एकदिवसीय हिवाळी मुल्यसंस्कार शिबीर उत्साहात संपन्न
गुरूपुत्र आदरणीय श्री नितीनभाऊ मोरे यांनी दुरदृष्य प्रणालीतून केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन – ६२१ विद्यार्थ्यांनी घेतला विविध उपक्रमात सहभाग
साक्षर इंडिया लाईव्ह न्युज प्रतिनिधी: राजू जंगले वाळूज
बजाजनगर : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे पिठाधीश परमपूज्य गुरुमाऊली श्री आण्णासाहेब मोरे यांच्या कृपाशीर्वादाने व गुरूपुत्र आदरणीय नितीनभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर एकदिवसीय हिवाळी मुल्यसंस्कार शिबीराचे आयोजन एकाच दिवशी व एकाच वेळी प्रत्येक तालुका स्तरावर करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी व त्यांच्यातील सुप्त गुणांना मुक्त संचार करता यावा तसेच त्यांच्या सामाजिक, व्यवहारीक व शैक्षणिक जडणघडणीचा कणा मजबूत व्हावा या उद्देशाने सदरील शिबीराचे बजाजनगर येथील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात विविध उपक्रमांच्या माध्यमातून आयोजन करण्यात आले होते.
बजाजनगर परिसरात जवळपास वेगवेगळ्या ४५ ठिकाणी प्रत्येक रविवारी बालसंस्कार वर्ग घेण्यात येतो. एकदिवसीय हिवाळी मुल्यसंस्कार शिबीरासाठी परिसरातील विद्यार्थी, बालसंस्कार प्रतिनिधी व पालक यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन व श्री स्वामी समर्थ महाराज, श्री सरस्वती माता व राजे शिवछत्रपती यांच्या पुजनाने करण्यात आली. कार्यक्रमाची प्रस्तावना सादर करून प्रमुख मान्यवरांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.
सकाळी ८.३० वाजता योगासने घेऊन शिबिरातील उपक्रमास सुरवात करण्यात आली. स्तोत्र – मंत्र व जप घेऊन त्यामागील वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांना सांगण्यात आला. याबरोबरच स्वसंरक्षण, चांगला – वाईट स्पर्श, अध्यात्मिक प्रश्नमंजुषा, विविध स्पर्धा, आदर्श दिनचर्या प्रात्यक्षिके, भारतीय कायदा, पारंपारिक खेळ इत्यादी उपक्रम राबविण्यात आले.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य श्री. सुभाष गोविंदराव राजवाळ, पतंजली योग समुहाचे श्री. जनार्दन नवसारे यांची विशेष उपस्थिती लाभली.
उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना परमपूज्य गुरुमाऊलींच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र देण्यात आले. सायंकाळी ५.३० वाजता पसायदान व राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व बालसंस्कार प्रतिनिधी, युवा प्रतिनिधी यांनी सहकार्य केले.
