
TET Exam | टीईटी परीक्षेत पहिल्यांदाच एआयचा वापर
साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज नेटवर्क
राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा रविवारी १० नोव्हेंबर रोजी होत असून या परीक्षेसाठी राज्यभरातून ३ लाख ३५ हजार ९३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. पेपर १ हा विषय १ लाख ५२ हजार ५९७ इतके विद्यार्थी तर पेपर दोन हा विषय २ लाख १ हजार ३४० इतके विद्यार्थी देणार आहेत. गेल्या काही परीक्षेत घडलेल्या पेपर फुटीच्या घटना तसेच झालेला गैरव्यवहार यामुळे या परीक्षेसाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर, मेटल डिटेक्टरने प्रत्येक विद्यार्थ्यांची कसून तपासणी केली जाणार आहे. प्रत्येक विद्याध्यनि परीक्षेपूर्वी दीड तास आधी परीक्षा केंद्रावर हजर राहणे बंधनकारक आहे, असे राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे यांनी परीक्षेची माहिती देताना सांगितले.
परीक्षा परिषदेच्या माध्यमातून २१ नोव्हेंबर २०२१ रोजी शेवटची टीईटी परीक्षा घेण्यात आली होती या परीक्षेसाठी ४ लाख ६८ हजार ६७९ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यानंतर तीन वर्षानंतर आता ही टीईटी परीक्षा घेतली जात आहे. राज्यातून ३ लाख ५३ हजार ९३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १ लाख १५ हजार ६२६ तर विद्यार्थिनींची संख्या २ लाख ३७ हजार ४१७ असून ९ ट्रान्सजेंडर विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. व दिव्यांग विद्यार्थ्यांची संख्या ४ हजार ८८७ आहेत. १ हजार २३ परीक्षा केंद्रांवर टीईटी परीक्षा होणार असून वर्ग खोल्या, केंद्र, संचालक कार्यालय, प्रवेशद्वार व बाहेर जाण्याचे द्वार अशा एकूण १८ हजार ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. परीक्षा परिषदेने टीईटी परीक्षेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्येक विद्यार्थ्यांची तपासणी केल्यानंतरच त्याला परीक्षा केंद्रात प्रवेश देण्याचे नियोजन केले आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांची फेस रीडिंग तसेच बायोमेट्रिकच्या माध्यमातून तपासणी केली जाणार आहे. अर्ज भरताना दिलेल्या माहितीनुसार ही तपासणी केली जाणार असून परीक्षा केंद्रावर आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये काही बदल असल्यास संबंधित विद्यार्थ्यांवर तात्काळ कारवाई केली जाणार आहे.
प्रत्येक परीक्षा केंद्रातील प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या कॅमेऱ्याच्या माध्यमातून राज्यभरातील केंद्रांवर वॉर रूमच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाणार आहे. एखाद्या परीक्षा केंद्रात पर्यवेक्षक काही मिनिटे एका जागेवरून दुसऱ्या जागी हलला नाही तरीसुद्धा या एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अलर्ट दिला जाणार आहे. त्याचप्रमाणे ३० विद्याध्यपिक्षा जास्त व्यक्ती एखाद्या केंद्रावर किंवा वर्गात कुठून आले हे सुद्धा तपासण्याचे यंत्रणा उभी करण्यात आली आहे. परीक्षार्थीन आवेदनपत्र भरताना फोटो दिलेला आहे. सर्व परीक्षार्थीच्या फोटोचा डाटा बेस तयार करण्यात आला आहे. बायोमेट्रीक घेतले जाणार आहे, त्या आधारे त्याची हजेरी लावली जाणार आहे. आवेदनपत्रावरील फोटोशी जुळतो की नाही याची खातरजमा करून मगच परीक्षार्थीस प्रवेश दिला जाणार आहे. परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारांवर, प्रत्येक परीक्षा दालनात व केंद्रसंचालकांच्या कक्षात सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. तसेच या कॅमेराचा थेट अॅक्सेस शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि.प. (सर्व) यांचे कार्यालयात, व राज्यस्तरावर परीक्षा परिषदेत घेण्यात आला आहे. तसेच या यंत्रणेद्वारे एआयच्या मदतीने सातत्याने सनियंत्रण केले जाणार आहे.
म्हणजेच एखाद्या ठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त गर्दी झाल्यास, परीक्षा दालनात पर्यवेक्षकांनी फेऱ्या न मारता एकाच ठिकाणी उभे राहिल्यास, विद्याथ्यांनी बैठक व्यवस्था हालविल्यास, तसेच अन्य कोणत्याही गैर हालचाली झाल्यास कारवाईसाठी तात्काळ प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात व महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेतील नियंत्रण कक्षात अलार्म येणार आहे. यानुसार तात्काळ अनुषंगिक सूचना केंद्रसंचालकांना दिल्या जाणार आहेत.
