संपादकीय

आजची शिक्षण व्यवस्था-दीपक सोनवणे-साहित्यिक

हे भविष्यातील शाश्वत सत्य असेल..!

आजची शिक्षण व्यवस्था-दीपक सोनवणे-साहित्यिक

साक्षर इंडिया लाईव्ह न्युज नेटवर्क

शाळा हे सृजनशील व सहिष्णुतावादी सामाजिक व्यवस्था निर्माण करणारे केंद्र होय. शाळेतूनच भविष्यातील समाज व्यवस्थेला दिशा मिळते. गुणवत्तापूर्ण शिक्षण व संस्कारक्षम विद्यार्थी घडवणे हे शिक्षण व्यवस्थेचे ध्येय आहे. आजचा विद्यार्थी उद्याचे भविष्य आहे, याच जाणिवेने भारवलेले शिक्षक व त्यांच्या अंतरंगातील तळमळ विद्यार्थ्यांच्या हृदयात स्थान निर्माण करतात. 

        शिक्षण व्यवस्थेचा ‘कणा’ हा शिक्षक असतो. त्यांच्या विचारातच समाजाचे भविष्य सामावलेले असतात. शिक्षणाचे व्रत घेऊन शिक्षक तनमनाने जीव ओतून या शैक्षणिक व्यवस्थेला आकार देण्याचे कार्य करत असतात. समोर बसलेल्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यात भविष्य शोधून ते ज्ञानदानाचे कार्य करत असतात. विद्यार्थ्यांमध्ये एक भावनिक जग निर्माण करून त्यांच्या भावविश्वाला झेप घेण्याचे प्रेरणा व बळ देत असतात. प्रत्येक मूल वेगळ्याच विश्वाची कल्पना आपल्या मनात निर्माण करून त्या दिशेने स्वतःची वाट निर्माण करत असतात. त्यांच्या अस्तित्वाची एक वेगळीच ओळख निर्माण करण्यासाठी ते आयुष्याची झुंज देत असतात. शिक्षक त्यांच्या मागे भविष्याला आकार देण्यासाठी उभे असतात. कारण शिक्षक भविष्यातील पिढीचा ‘शिल्पकारच’ असतो. शाळेत येणारे मूल म्हणजे आयुष्याच्या उमललेल्या आईच्या ह्रदयाच्या कळ्याच असतात. त्यांच्या आयुष्याचे सुंदर फूल फुलवण्यासाठी शिक्षकांचा त्यांच्या पाठीवर आश्वासक थाप असते. मुलांच्या भावविश्वावर शिक्षकांचा परिणाम अधिक होत असतो. कारण ती मुले अनुकरणीय व संवेदनशील असतात. त्यांच्या मनात फुललेल्या संवेदना कोमेजू नये, यासाठी लाख संकटे पेलून शिक्षक त्यांच्या समोर उभे असतात. त्यांना फक्त एकच माहीत असते की माझ्यासमोर भविष्यातील समाज व्यवस्थेची ‘निर्मिती’ आहे. आपल्या विचारातूनच हा समाज सक्षमपणे उभा राहणार आहे. याच सहिष्णुतावादी समाजाची रचना त्यांच्या डोळ्यांत सामावलेली असते. शिक्षकांचे बलस्थाने तसेच सक्षम असावे. असे मला वाटते.

        आपण गुरुकूल पद्धती पासून शिक्षण व्यवस्थेचा इतिहास अभ्यासत आलेलो आहोत. एका झाडाखाली भिंती नसलेल्या, बिनभिंतीची निसर्ग शाळा, त्यात कसलेही शैक्षणिक साहित्य नसताना मुले निसर्गाशी एकरूप होऊन, त्यांना मिळालेल्या गुरुजींच्या प्रेरणेमुळे समाजात सक्षमपणे उभे राहिलेत व आदर्शवादी जीवनाचे स्रोत बनलेत.

       आज सर्व गोष्टी मुबलक असताना मुले वैफल्यग्रस्त का बनले? याच्या कारणांचे समिक्षण व शोध घेण्याची वेळ आलेली आहे. शिक्षण व्यवस्थेत भविष्याचे अनेक आवाहने उभी राहिले आहेत. त्यांचा भविष्यातील विचार समोर ठेवून अभ्यासक्रम आराखडे तयार होतात. सर्वांसाठी शिक्षण व शिक्षणातून समाज निर्मिती हे उद्दिष्टे डोळ्यापुढे ठेवून, अभ्यासक्रम रचना केली जाते. आजच्या स्पर्धेच्या युगात जगाला काय हवे हा जागतिक विचार समोर ठेवून जगाशी स्पर्धा करणारे विद्यार्थी शाळेतून घडले पाहिजेत. या सहिष्णू विचाराने शिक्षणतज्ञ आज झपाटलेले आहेत. जागतिक स्पर्धेच्या विचारातून विद्यार्थी उभे राहण्याचे बळ निर्माण करण्यासाठी शैक्षणिक व्यवस्थेत अनेक प्रकल्पांचा प्रयोग केला जात आहे. या शैक्षणिक प्रयोगाला पेलण्याची क्षमता शिक्षक स्वतःमध्ये निर्माण करून वाटचाल करत आहेत. ही एक परिवर्तनाची बाब होय. अनुकूलतेला प्रतिकूल बनवण्याचे सामर्थ्य शिक्षकात असल्यामुळे, तो सक्षमपणे आजच्या शिक्षण व्यवस्थेत उभा आहे.

      आजची शिक्षण व्यवस्था ही डोंबाऱ्याच्या खेळासारखी तारेवर कसरत करण्यास लावणारी आहे. रोजच अनेक शैक्षणिक प्रकल्पांची रचना होऊन त्या प्रकल्पांचा प्रयोग शिक्षकावर ढोल बडवून-बडवून केला जातो. शिक्षकांची ‘कठ पुतळी’ निर्माण करणारी आजची शिक्षण व्यवस्था बनली आहे. त्यांच्या मनात येईल तसे ते दोरा धरून शिक्षकांना बोटाच्या इशाऱ्याने नाचवताना दिसत आहेत. रोजच नवे शैक्षणिक प्रकल्प, नव्या संकल्पनांचा पूर ओसांडतांना दिसत आहे. भयभीत चेहऱ्याने आणि आजचे नवे काय येईल या विचारातच, तो शाळेची पायरी चढताना चेहऱ्यावर असंख्य प्रश्नांनी कोमेजून गेलेला आहे. शिक्षकांच्या मनात भविष्याची भीती निर्माण करण्यास कारणीभूत ठरलेली ही शिक्षण व्यवस्थाच होय.

          आज शिक्षकांचा ‘स्वर’ गोठून ते मुक्याचा मार मनातच कोंडून, या व्यवस्थेच्या प्रहारात कोलमडून गेलेला आहे. काय करावे? आणि काय करू नये? या अनुत्तरीत प्रश्नाभोवती त्यांचे मन घिरट्या घालताना दिसत आहे.

       या आजच्या शिक्षण व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न करू लागला तर त्याला अधिकारवाणीने गपचिप करून त्याचा ‘स्वर’ दाबण्याचा प्रयत्न केला जातो, मूग गिळून तो हे सारं सहन करून जिवंतपणीच या व्यवस्थेच्या षडयंत्रात मरून गेलेला आहे. स्वतंत्रपणे विचार करून समाज उभा करण्याची शक्ती त्यात असताना, त्यांच्यावर शिक्षण व्यवस्थेचे विचार लादून त्याला भावनिक ‘गुलाम’ बनवण्यास ही शैक्षणिक व्यवस्था कारणीभूत ठरत आहे.

        शिक्षकांच्या शैक्षणिक स्वातंत्र्यावर राजकीय स्वार्थाची ‘गदा’ आलेली आहे. तो स्वतंत्रपणे समाजात विचारधारा पेरून उगवू शकतो. पण आम्ही सांगू तेच करावे. हेच मानसिक दडपण त्यावर आहे. म्हणून त्यांच्या विचारात व मनात आजच्या शिक्षण व्यवस्थेविषयी ‘विद्रोही’ भावना निर्माण झाल्या आहेत. या विद्रोहाचा कधी स्फोट होईल हे काळच ठरवेल.

          शैक्षणिक सोयी-सुविधा उपलब्ध असून देखील आजचे विद्यार्थी स्पर्धेच्या युगात का टिकू शकत नाही? याच्या कारणांच्या मुळाशी आपण गेलो तर शिक्षण व्यवस्थेच्या बीजांकूरणाला पोषक असलेले शिक्षकांची मनेच खिळखिळे झालेले दिसून येते. शैक्षणिक व्यवस्थेत महत्त्वाची भूमिका पार पाडणारा शेवटचा घटक हा ‘शिक्षक’ असतो. तोच आज दिवसेंदिवस सुरू असलेल्या नवनवीन प्रकल्पांच्या भडीमारात मनाने कोसळलेला दिसून येतो.

         अती दुर्गम भागात किंबहुना समृद्ध भागातही आज काही शाळेचे छत गळके आहे,पत्रे फाटलेली आहेत.कौलारे तुटलेले आहेत.शाळेची इमारत जीर्ण झालेली आहे. ज्या शाळेतून भविष्याची पिढी निर्माण होणार आहे त्या शाळेतील लेकरं पावसात भिजत, थंडीने कुडकूडत शिक्षण घेताना दिसतात. अजूनही काही शाळेचा रस्ता पावसाळ्यात चिखलमय होतो. गुडघ्या एवढे पाय रुतून मुले आपल्या भविष्याकडे धाव घेताना दिसतात. याकडे सर्रासपणे दुर्लक्ष करून फक्त शिक्षकच दिसतात काय? बऱ्याच शाळेत मुलांना पोषण आहार निकृष्ट पुरवला जातो.(अपवादात्मक) त्यांच्या शरीराचे झीज भरून काढण्याचे फक्त नाटक रचले जाते. एनकेन कारणाने शाळेत पोषण आहारात कमी अधिक झाले तर शिक्षकांच्या डोक्यावर खापर फोडून स्वतःची चूक लपवणारे झैल- झोले मोकळे होतात.टांगती तलवार डोक्यावर घेऊन शिक्षक प्रामाणिकपणे अध्यापनाचा वसा चालवत असतात. पण इथल्या व्यवस्थेने त्यांना राबणारा घटक बनवून टाकले आहेत. अशैक्षणिक कामात तर त्यास वर्षातून काही काळ गुरफटून ठेवले जात असते. अनेक कामे शिक्षकांना करताना पर्यायाने मूळ उद्दिष्टापासून दूर ढकलून, शेवटी त्याच्यांवरच खापर फोडून मोकळे होणाऱ्या या व्यवस्थेने शिक्षक हा आपल्या सारखाच हाडामासाचा प्राणी आहे. त्यालाही भावना आहे, मन आहे याचा विचार करणे आवश्यक आहे.

       आज अनेक शैक्षणिक प्रकल्पांची प्रयोगशाळा ही मराठी असो व संस्थेची शाळा बनलेली आहे. असो पण या प्रयोगातून साध्य काय झाले? हे फक्त कागदी घोडे नाचवणे हेच होते. एकच प्रकल्प व त्याची सातत्यता वर्षभर सुरू राहील याची शाश्वतीच नसते.

       राजकीय समीकरणे बदललेकी बेरीज वजाबाकी सुरू व्हायला सुरुवात होते. राजकीय वर्चस्वाच्या झुंडशाहीचे परिणाम सर्वात आधी शिक्षण व्यवस्थेवर झालेले दिसून येते. सहा- सहा महिनेच नव्हे तर महिना बदलला की नवीन शैक्षणिक प्रकल्प आला समजा, हे गणित शिक्षकांनी मनात ठरवून घेतले आहे.

        आज सर्व शिक्षक चिंताग्रस्त अवस्थेत आहेत. कारण सर्वात आधी शिक्षण व्यवस्थेत अनेक प्रकल्पांचा सुळसुळाट होतो. जणू काय शाळा या प्रकल्पांच्या प्रयोगशाळाच बनल्या आहेत. आज या असल्या कारणाने शिक्षकांचे ‘ब्रेनडेड’ व्हायला लागले आहेत. कारण शिक्षण व्यवस्थेत सर्वात खालचा स्तर हा शिक्षकांचा आहे. त्याला स्वतंत्रपणे निर्णय घेऊन विचार करण्याची क्षमताच हिरावून घेतली जाते. शिक्षण व्यवस्थेत तो स्वतंत्र असूनही व्यवस्थेच्या बालंडात पारतंत्र्यासारखी त्याची गत झालेली आहे. रोजच नवे आदेश, सकाळी, दुपारी संध्याकाळी शासन निर्णयाचे फडफडणारे पाने, त्यांच्या डोळ्यातील बिंदूत अश्रू होऊन नाचू लागले आहेत.

       शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांची मुख्य भूमिका ही अध्ययन अध्यापनाची आहे, परंतू आजच्या व्यवस्थेने शिक्षकांना शासनाचे ‘चाकर’ बनवले आहे. मतदान असो वा मतदार नोंदणी, तसेच शासकीय निर्णयाचे सर्वेक्षण अस्या अनेक कामाचा बडेजाव त्यांच्या डोक्यावर लादला जातो. याचा परिणाम त्यांच्या मानसिकतेवर होऊन ते मुख्य भूमिकेपासून वंचित होऊ लागले आहेत. या अशा व्दंद स्थितीच्या गुऱ्हाळात त्याला निपचून काढले जात आहे. वर्षभराच्या शैक्षणिक सत्रात किती परीक्षा घ्याव्यात व घेणे लागतील याच्या मर्यादाच ओलांडलेल्या आहेत.शिक्षक भयभित झाले तसेच विद्यार्थीही झालेले आहेत.आठवड्यालाच परीक्षा म्हणून विद्यार्थीही शाळेकडे पाठमोरे होतांना दिसत आहेत.हे वास्तव आहे. याचा विचार व्हायला हवा.दिवस कमी आणि सोंगे फार अशीच गत झालेली आहे. यात कमी अधिक झाले तर शिक्षकच दोषी म्हणून सारीकडे बोंबाबोंब सुरू होते.

          आज शिक्षकांमध्ये या व्यवस्थेविषयी ‘विद्रोही’ मनोवृत्ती तयार झालेली आहे. रोज घरून शाळेच्या दिशेला पाऊल टाकताना त्यांच्या पावलातही बळ राहिले नाही. कारण शाळेच्या पहिल्या पायरीला स्पर्श करत नाही तोवर नवीनच काहीतरी आदेश आलेला असतो. याच भीतीने त्यांचे मन हादरत असते. शिक्षकांच्या मनात ताण-तणावाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे त्यांच्या मनावर सतत प्रहार होत आहेत. शासनांच्या शैक्षणिक स्वप्नपूर्तीसाठी शिक्षकांची ‘आहुती’ देऊ नका. त्यांच्यावर तुमचे निर्णय लादून त्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेऊ नका. ही व्यवस्था म्हणजे शिक्षकांच्या भावनेला ‘सुरुंग’ लावणारी आहे. त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे शैक्षणिक कामे करू द्या. त्यांना शैक्षणिक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले तर निश्चितपणे ते भविष्यातील शैक्षणिक पिढी निर्माण करण्यात यशस्वी होतील, असे मला वाटते. तुमच्या हट्टयोगी धोरणामुळे शिक्षकांतील शिक्षकच खाऊन टाकला आहे. चाबी फिरवून नाचणारा ‘बाहूला’ तो बनला आहे,

        शिक्षक म्हणजे कर्तव्याचा ‘स्वामी’ पण मनाने गोठलेला दवबिंदू झाला आहे. तो चमकण्यासाठी धडपडतो आहे जीव ओतून काम करतो आहे. प्राण समजून शाळा सांभाळत आहे. पण या व्यवस्थेत तो कुठेतरी घुटमळला आहे. त्याचा गळा घोटला गेला आहे. त्याच्या स्वातंत्र्यावर बालंड उभे राहिले आहे हे केवळ या शासन व्यवस्थेत निर्माण झालेल्या शासक विचारांचे. याच वैचारिक प्रतिष्ठित परंपराने त्याला वैचारिक ‘गुलाम’ बनवले आहे. शासकीय दडपशाहीचे कोरडे त्यावर सतत ओढले जात आहेत. जो काम करतो त्यास वैचारिक घाला घालून मागे ओढले जाते. आज जिल्हा परिषदेच्या शाळा म्हणजे केवळ शैक्षणिक प्रकल्पांच्या प्रयोगशाळा बनल्यात वैज्ञानिक प्रयोगशाळेत बेडकावर प्रयोग केला तर तो बेडूक या जगात जिवंत राहू शकत नाही. मी शिक्षकांना बेडूक म्हणत नाही. पण अशा शैक्षणिक प्रकल्पांचे प्रयोग आमच्यावर करून आमची गत आता जिवंत असूनही या जगाचे भान हरपल्यासारखी झाली आहे. म्हणजे आमचे डोके ‘ब्रेनडेड’ झाले आहे. ते केवळ या शासनाच्या शासक तसेच जाचक वैचारिकेमुळे. आज कुठेतरी शिक्षक गोरगरीब, मोलकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या, जिल्हा परिषद शाळा वाचवण्यासाठी धडपडतो आहे खाजगी रजिस्ट्रेड गढीच्या संस्थानिकांच्या शाळेतील मुले त्यांच्या शाळेतून जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश अगर परत येत आहेत. म्हणून आपले शैक्षणिक संस्थान खालसा होऊन आपली पिढीजात शैक्षणिक बाजारपेठ बंद होते की काय या भीती पोटी जिल्हा परिषदेच्या शाळेच्या शिक्षकांना वेगवेगळ्या कामात गुंतवणे सुरू केले आहे. तरी आमचा शिक्षक दमत नाही ‘ब्रेनडेड’ होत नाही. हे लक्षात आल्यावर त्यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागली. कारण त्यांच्यात असलेली राजकीय स्पर्धा आणि त्यांनी निर्माण केलेल्या शैक्षणिक संस्थेला कुठेतरी धक्का बसतो. याची भीती त्यांच्या मनाला कोरू लागली आहे. वाड्या वस्तीवरील वस्तीशाळा ही संकल्पना शासनाची ती केवळ मताधिक्याच्या आश्वासनाची पूर्ती होती. पण आपण तिला पूर्ण केली. आज वस्तीशाळांचे रूपांतर नियमित शाळेत झालेले पाहून त्यांना अधिक हादरे बसलेत. सुरुवातीला वाटत होते की, काही काळ या शाळा टिकतील. पण आज त्या शाळेने बदलते रूप धारण केल्यामुळे त्यांनी मताधिक्यासाठी फेकलेला ‘बुमरँंग’ त्यांच्यावरच उलटले आहे. याचे कारण तन मनातून शैक्षणिक कामाने झपाटलेले शिक्षकच होय. याचमुळे त्यांच्या शैक्षणिक संस्थेला सुरुंग लागून कुठेतरी शैक्षणिक दुकानदारी डळमळीत झालेले लक्षात येतात त्यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षकाकडे मोर्चा वळवणे सुरू केले. जेणेकरून त्यांना जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना अशैक्षणिक कामाच्या राहटा भोवती फिरवायला लावून. त्यांना मूळ उद्देशापासून दूर घेऊन जाण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे. समाज व्यवस्थेत जिल्हा परिषदेच्या शाळा कशा आहेत? असे चित्र निर्माण करून जिल्हा परिषदेच्या शाळेविषयी समाजात नकारात्मक चित्र निर्माण करण्यासाठी काही महाभाग भर सभेत मुलांना स्टेजवर बोलावून पाढे म्हणायला लावतात. ज्या लेकराला अजून जग कळाले नाही. त्यांच्यात स्टेजवर उभे राहण्याचे धारिष्टे आले नाही. त्यांच्याकडून ही अपेक्षा करणे म्हणजे किती मूर्खपणाचा कळस गाठणे होईल. यांना फक्त एकच साध्य करायचे की, जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांची प्रगती कुठवर आहे. हे लोकांना दाखवून, आमच्या शाळा किती गुणवत्ता पूर्ण आहेत. हे सिद्ध करायचा आटापिटा सुरू आहे. शिक्षक हे काही यंत्र नव्हे कच्चामाल घेऊन लगेच पक्क्या मालाची निर्मिती होईल. ज्यांना जग कळाले नाही. अक्षराच्या फरकांड्यात स्वतःचे विश्व शोधणाऱ्या कोवळ्या लेकरांच्या मनातील भाव विश्वाला आकार देताना, त्यांच्या भावनेचा विचार करणे. आजच्या शैक्षणिक व्यवस्थेत व्यवस्थेला चूड लावण्याचे काम इथली शैक्षणिक संस्थानिकच आहेत. त्यांच्या वाढता राजकीय हस्तक्षेप थांबवला तर शिक्षक या परिवर्तनीय समाज व्यवस्थेला आकार देऊन, भविष्यातील शैक्षणिक पिढी निर्माण करणारा ‘शिल्पकार’ होईल. फक्त त्यांचे नाते खडू फळा यातच निर्माण करण्याचे स्वातंत्र्य दिले, तर तो हे जग बदलून टाकेल.नाहीतर या आजच्या शैक्षणिक व्यवस्थेने निर्माण केलेले दोरा तुटलेले बिन शेपटीचे दिशाहिन झालेले पतंग पकडायला धावण्याची झुंज द्यावी लागेल..! हे भविष्यातील शाश्वत सत्य असेल..!

    -दीपक सोनवणे.साहित्यिक 

       सिल्लोड

      9860107398

deepaksonawane044@gmail.com

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close