राजकियराज्य

“महाराष्ट्रात सत्तास्थापनेबाबत एकनाथ शिंदे हा अडसर नाही, मोदींचा निर्णय आम्हाला मान्य”; एकनाथ शिंदेंची घोषणा

शिंदे हे आता राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत.

“महाराष्ट्रात सत्तास्थापनेबाबत एकनाथ शिंदे हा अडसर नाही, मोदींचा निर्णय आम्हाला मान्य”; एकनाथ शिंदेंची घोषणा

साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज नेटवर्क (वृत्तसंस्था)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातल्या पत्रकार परिषदेत सगळ्या पत्रकारांचं स्वागत केलं. निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच तुम्ही भेटत आहात. तुमच्या माध्यमांतून सगळ्या मतदारांचे आभार मानतो. हा जो विजय आम्हाला मिळाला तो अभूतपूर्व विजय आहे. गेल्या अनेक वर्षांत असा निकाल जनतेने दिलेले नाही. मागच्या अडीच वर्षात महायुतीने उत्तम काम केलं आहे. एकीकडे विकासकामं केली, महाविकास आघाडीने थांबवलेली कामं आम्ही पुढे नेली असंही एकनाथ शिंदे म्हणाले. तसंच दुसरीकडे कल्याणकारी योजना राबवल्या. विकास आणि कल्याणकारी योजनांची सांगड आम्ही घातली असंही एकनाथ शिंदे म्हणाले. महायुतीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी प्रचंड काम केलं आहे. मी कार्यकर्त्यांचेही आभार मानतो असंही एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातल्या पत्रकार परिषदेत सांगितलं.

मी जवळपास ८० ते ९० सभा घेतल्या

एकनाथ शिंदे म्हणाले मी जवळपास ८० ते ९० सभा घेतल्या. तसंच एक साधा कार्यकर्ता म्हणून काम केलं. प्रवास तर पायाला भिंगरी लावून काम केलं. सीएम म्हणजे कॉमन मॅन ही माझी धारणा आहे. त्यामुळे लोकांशी संवाद साधताना कुठलाही अडथळा येत नव्हता. महाराष्ट्राच्या सरकारमधून आपण काही ना काही केलं पाहिजे असं मला कायमच वाटत होतं. मी शेतकरी कुटुंबातून आलो आहे त्यामुळे मी सामान्यांच्या वेदना, काटकसर, तडजोडी सगळं पाहिलं आहे असंही एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे. महायुतीवर लोकांनी विश्वास दाखवला. समाजातल्या सगळ्या घटकांसाठी आपण काही ना काही केलं पाहिजे अशी भावना माझ्या मनात होती असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

मी लोकप्रियता मिळवण्यासाठी काम केलेलं नाही-एकनाथ शिंदे

मी लोकप्रियता मिळवण्यासाठी किंवा कुठलंही मोजमाप व्हावं म्हणून मी काम केलं नाही. तर सरकार म्हणून काय देऊ शकतो ते देण्याचा आम्ही प्रयत्न केला. केंद्र सरकार पर्वताप्रमाणे उभं राहिलं हे मी पुन्हा एकदा सांगू शकतो. दोन ते अडीच वर्षांत लाखो कोटींचा निधी आम्ही केंद्राकडून मिळवला. त्यामुळे मी एवढंच सांगेन की कुठे घोडं अडलं आहे? मी मनमोकळेपणाने सांगतो आहे, मी काहीही ताणून धरलेलं नाही. मी मोदींना फोन करुन सांगितलं की सरकार बनवताना कुठलीही अडचण आहे माझ्यामुळे हे मनात आणू नका. तुम्ही घेतलेला निर्णय भाजपासाठी अंतिम असतो तसा आम्हालाही तो अंतिम आहे. एकनाथ शिंदेंची अडचण होणार नाही हे मोदी आणि अमित शाह यांना सांगितलं. त्यांना मी सांगितलं की तुम्ही तुमचा निर्णय घ्या असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं.

आम्ही काम केलं म्हणून आमच्यावर मतांचा वर्षाव झाला-एकनाथ शिंदे

आमच्यावर मतांचा वर्षाव झाला तो महायुती सरकारने जे काम केलं, जे निर्णय घेतले त्यामुळे झालं आहे. लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही माझी ओळख महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. लाडक्या बहिणींनी सावत्र भाऊ कोण ते ओळखलं. मी समाधानी आहे. लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख मला कुठल्याही पदापेक्षा मोठी आहे. मी नाराज वगैरे मुळीच नाही, रडणारे नाही तर लढणारे आहोत, लढून काम करणारे लोक आहोत असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. आम्ही लोकांमध्ये गेलो, घरी बसलो नाही. आम्ही जे काम केलं ते मनापासून केलं. माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी जनतेसाठी काम करत राहिन असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

आम्ही बाळासाहेबांचा विचार पुढे नेला

आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन पुढे घेऊन गेलो. आनंद दिघे यांचे विचार घेऊन गेलो. आम्ही पर्वताप्रमाणे तुमच्या मागे उभे आहोत असं आम्हाला अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होतं. आम्हाला त्यांनी मुख्यमंत्रिपद दिलं. मी त्या प्रत्येक दिवसाचा, क्षणाचा वापर राज्याच्या हितासाठी केला. मी मोदी आणि अमित शाह यांचे आभार मानतो. कारण त्यांचं पाठबळ लाभलं. या सगळ्या अडीच वर्षांच्या काळात प्रगतीचा वेग वाढला. मी अडीच वर्षांच्या माझ्या कालावधीत समाधानी आहेत. आमच्या सरकारमध्ये जे निर्णय झाले ते आजवर आम्ही जे निर्णय घेतले ते रेकॉर्डब्रेक आहेत. पत्रकार असोत, शेतकरी असो, लाडक्या बहिणी असोत सगळ्यांचे प्रश्न आम्ही सोडवले. आमच्या काळात १२४ सिंचन प्रकल्प तयार झाले आहेत. या राज्याच्या प्रगतीचा वेग वाढला आहे. असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

महायुतीचं सरकार येणार हे निश्चित

महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येणार हे स्पष्ट झालं आहे. कारण २३ नोव्हेंबरला जो निकाल लागला, त्यात महायुतीला अभूतपूर्व यश मिळालं. महायुतीला २३९ जागा मिळाल्या आहेत. महायुतीत सर्वात मोठा पक्ष भाजपा ठरला आहे. एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांच्यासह शिवसेनेचे नेते दादा भुसे, संजय शिरसाट आणि इतर नेते उपस्थित होते. एकनाथ शिंदे काय बोलणार याची उत्सुकता कायम होती. आता एकनाथ शिंदे यांनी त्यांची भूमिका मांडली आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा २६ नोव्हेंबरला दिला आहे. त्यामुळे राज्यातली १४ वी विधानसभा बरखास्त झाली आहे. त्यानंतर आता एकनाथ शिंदे हे आता राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close